ग्रामपंचायत नाटे ही रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाटे, भराडीण आणि बांदचा वाडा या तीन महसुली गावांची ग्रुप ग्रामपंचायत आहे. रत्नागिरी या शहराच्या ठिकाणापासून ५० किमी व राजापूर या तालुक्याच्या ठिकाणापासून २५ किमी अंतरावर नाटे गाव वसले आहे. नाटे ग्रामपंचायत हद्दीतील तीनही गावांचे एकूण क्षेत्रफळ १९६० चौ. मी. असून एकूण लोकसंख्या ३७१२ एवढी आहे. तीनही महसुली गावांमध्ये मिळून एकूण १६ वाड्या तसेच काही पोटावाडया आहेत. नाटे गावाच्या दक्षिणेकडे असलेले साखरी नाटे हे गाव पूर्वी ग्रुप ग्रामपंचायत नाटे मध्येच होते. १९८९ साली साखरी नाटे ही स्वतंत्र ग्रामपंचायत झाली.
नाटे गावाच्या दक्षिण दिशेला जैतापूरची खाडी, पश्चिमेकडे आंबोळगड समुद्रकिनारा, पूर्वेकडे धाऊलवल्ली आणि उत्तरेकडे राजवाडी ही गावे येतात. जांभ्या दगडाचा विस्तृत सडा नाटे गावाला लाभला आहे. श्री नाटेश्वर मंदिर आणि श्री नवलादेवी मंदिर ही गावाची ग्रामदैवते आहेत. हिंदू, मुस्लिम, बौद्ध असे सर्व समाजाचे लोक या गावांत एकोप्याने राहतात. गावाची अर्थव्यवस्था ही बहुतांश आंबा व्यवासाय आणि मच्छीमारी यावर अवलंबून आहे. आंबोळगड समुद्रकिनारा, साखरी नाटे येथील घेरा यशवंतगड किल्ला, मुसाकाझी बंदर अशी काही पर्यटनस्थळे व ऐतिहासिक ठिकाणे नाटे गाव व आजूबाजूच्या परिसरात आहेत. अलीकडे अनके सहकारी व राष्ट्रीययीकृत बँका, मच्छीमारीवर आधारित छोटे-मोठे व्यवसाय, नाटे-रत्नागिरी वाहतूक व्यवसाय, अनेक चीजवस्तूंची दुकाने वाढत असल्याने गावाची अर्थव्यवस्था विकसित होत आहे.